Saturday, June 23, 2012

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...

दोन मित्र, अगदी जीवा भावाचे ...
एकाचे नाव शाम तर दुसरा राकेश..
जीव इतका दोघांचा एकमेकांवर की शाळेला जाताना, घरी येताना, बाहेर जाताना नेहमी सोबत...
असे वाटावे  पाहणाऱ्याला की जणू काही सक्खे जुळे भाऊच...

दोघे एकाच वर्गात शिकायचे...
शिकता शिकता मोठे झाले, पुढच्या शिक्षणासाठी स्पर्धा सुरु झाली..
दुर्दैवाने दोघांना शिक्षणासाठी वेगळे व्हावे लागले, दोघे वेगवेगळ्या गावात, करमेना एकमेकांवाचून...
पण करणार काय, स्वप्ने होती.. ती तर पूर्ण करायची होती... 
काही महिने दर आठवड्याला भेटणे... मग काय दोन दोन दिवस गप्पा, हुंदडणे...
मग अभ्यासाचा व्याप इतका वाढला... की दर आठवड्यांची भेट महिन्यांवर व्हायला लागली...
महिन्यांनी भेटल्यावर काय काय गंमती सांगू ह्यातच दोन दिवस जायचे...

कालांतराने महिन्यांनी भेट होईना .. नौकरी चे tension, शिक्षणाचे चीज व्हावे म्हणून काम शोधणे गरजेचे..
मग कामाचा व्याप.. तरीही आठवणीने सुट्टी काढून 3-4 महिन्यांनी भेट..
वय झाले. घरच्यांना सुनमुख पहाण्याची हौस. नौकरी मिळाली... लगेच छोकरी ही मिळाली... 
एकमेकांच्या लग्नात धमाल उडवली... पुन्हा भेटण्याचे वचन घेऊन निघाले शूर-वीर लढायला, आपआपली  संसाराची रणांगणे जिंकायला...


पुन्हा  काही दिवसांनी भेटण्याचा योग तर पहा तो... दोघे आले होते एकाच गावात...
कुटुंबासहित सुट्टी घालवायला... भेटले रस्त्यात...
अचंबित झाले... " वाढलेल्या " कुटुंबाची ओळख करून देत एकमेकांना ओळखण्याचा कार्यक्रम...
खूप दिवसांनी भेट आणि त्यात वया नुसार झालेला बदल...
पुन्हा तेच भेटण्याचे वचन आणि  घेतलेला निरोप..

......पण आज खूप दिवस झाले शाम आणि राकेश भेटले नव्हते ... किती वर्ष झाली त्यांच्या भेटीला,  हे शामला पण आठवत नव्हते..
पण राकेशचा तो तजेलदार चेहरा पाहून शाम पेपर मधली बातमी वाचत होता..
                 " तीव्र हृदय विकाराने डॉ राकेश जाधव यांचे आज पाहटे निधन... " पुढे काही शाम ला वाचवेना, शामने पेपर बाजूला केला आणि सुरकुत्या पडलेल्या आपल्या गालावरचे ओघळणारे अश्रू टिपले..